स्वदेशी शस्त्रांमुळेच पाकिस्तानचा पराभव   

पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन 

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी मोहीम नाही तर बदलत्या भारताचे प्रतिबिंब आहे. स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांमुळेच आपण पाकिस्तानचा पराभव करू शकलो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे राष्ट्राला संबोधित करताना मोदी म्हणाले, संपूर्ण देश दहशतावादाविरुद्ध एकवटला आहे. प्रत्येकाच्या मनात दहशतावादाविरोधात संताप आहे. हा दहशतवाद आपल्याला संपवायचा आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान आपल्या सैन्याने दाखवलेल्या शौर्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. भारतीय सैन्याने सीमेपलीकडून दहशतवादी पायाभूत सुविधांवर ज्या अचूकतेने हल्ला केला हे असाधारण आहे. या कारवाईने दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईत नवीन आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण केली आहे. 
 
ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नव्हती, तर आपल्या दृढनिश्चयाचे, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र आहे. या चित्राने संपूर्ण देशाला देशभक्तीच्या भावनांनी भरले आहे आणि तो तिरंग्यातही रंगवला गेला आहे. भारताने बनवलेल्या शस्त्रास्त्रांचे उपकरणांचे आणि तंत्रज्ञानाचे बळ या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पहायला मिळाले. या विजयात आपल्या अभियंत्यांचा, तंत्रज्ञांचा सहभाग आहे.
 
गुजरातच्या गीरमध्ये वाढलेल्या सिंहांच्या संख्येचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. गेल्या पाच वर्षांत गुजरातमधील गीरमध्ये सिंहांची संख्या ६७४ वरून ८९१ पर्यंत वाढली आहे. मोठ्या संख्येने महिला वन अधिकारी असलेले गुजरात हे देशातील पहिले राज्य बनले आहे. यात सर्वांच्या मेहनतीचा वाटा आहे. वन्यजीव संरक्षणासाठी आपण नेहमीच सतर्क राहिले पाहिजे.दरम्यान, ’व्होकल फॉर लोकल’ मोहिमेबद्दल नवीन ऊर्जा निर्माण झाल्याचे मोदी यांनी नमूद केले. या मोहिमेमुळे केवळ देशभक्तीची प्रेरणा मिळाली नाही तर स्वावलंबनाची भावनाही बळकट झाली आहे, असेही ते म्हणाले.
 

Related Articles